Get in on
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा शासनाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र पूर
लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक हुंडाई आय-१० कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत कुसगाव येथील आयआरबी कार्यालय परिसरात एका कारमधून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित शुभम शर्मा हा कारमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० (क्र. एमएच १४ बीके ७२३५) कारची झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान पोलिसांना ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित शुभम शर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला होता. लोणावळा व मावळ परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
लोणावळा : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शहीद स्मृतीस्थळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून शहीद शेतकऱ्यांना अभिवादन केले. यावेळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पवना पाणीप्रश्नावर शिवसेनेने आपली भूमिका ठामपणे मांडत प्रशासनाला इशारा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच मावळ शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या विचारांसोबत असून, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात आघाडीने पुढाकार घेत आहे. कालही, आजही आणि उद्याही शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे मांडत राहू,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळण्यास शिवसेनेचा विरोध नाही; मात्र हे पाणी नदी-पाटाच्या माध्यमातूनच मिळावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. पिंपरी-चिंचवडकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका नसून, सर्वसमावेशक पद्धतीने पाणीवाटप झाले पाहिजे आणि मावळातील शेतकरी व नागरिकांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका ठोंबरे यांनी स्पष्ट केली.मावळच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारे गदा आणली जाऊ नये, यासाठी शिवसेना ठामपणे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोणत्याही हुकूमशाही पद्धतीने बळजबरीने मावळचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास ‘तो प्रयत्न सर्वप्रथम शिवसेना रोखेल,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या आंदोलनात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या गोळीबारात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या शहीद शेतकऱ्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून त्यांच्या हक्कासाठी आणि मावळच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, जिल्हा समन्वयक शांताराम भोते, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, विभागप्रमुख संदीप झांबरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत भोते, वाहतूक तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेलार, काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, काँग्रेस सरचिटणीस दिलीप ढमाले, आरपीआय मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, उपविभागप्रमुख संजय विकारी, शंकर दळवी, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोलीच्या स्काऊट अँड गाईड तुकडीने खोपोली शहरातील लौजी गावात आयोजित केलेल्या समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वर्षा सहलीच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. तब्बल १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमात स्वतःच्या खाऊसाठी मिळणारे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी आदिवासी कुटुंबांसाठी गृहपयोगी साहित्य खरेदी करून त्याचे वितरण केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लौजी गावच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित वर्षा सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्त, सांघिक भावना आणि निसर्गप्रेमाचा अनुभव घेतला. त्यानंतर लौजी गावातील आदिवासी बांधवांना आवश्यक गृहपयोगी साहित्य तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातून संकलित केलेले वापरण्यायोग्य कपडे वितरित करण्यात आले. 'सेवा हीच खरी साधना' या भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सॅनियो स्पेशल स्टील कंपनीच्या (मस्को) सहकार्याने उपलब्ध झालेल्या फळ-फुलझाडे तसेच विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. "एक पॅट्रोल - एक वृक्ष" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. या उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी लौजी गावातील इतिहासप्रसिद्ध विहिरीलाही भेट दिली. विहिरीच्या ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी स्थानिक इतिहास, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलव्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेतले. कार्यक्रमासाठी हेल्प फाउंडेशन, खोपोलीचे संस्थापक गुरुनाथ साठेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समाजाभिमुख विचारांचे कौतुक करत, "समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि संवेदनशीलता हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची ओळख आहे. अशा उपक्रमांमधूनच देशाला जबाबदार आणि सुजाण नागरिक मिळतात," असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी कारमेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, लौजी ग्रामस्थ किशोर पाटील, अरुण पाटील, राम पाटील, जनता विद्यालय, लव्हेजच्या मुख्याध्यापिका संगीता पवार, ग्रामस्थ तसेच आदिवासी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, सिस्टर सिमी, रेश्मा जाधव, जयसिंथा आणि समीर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. "सेवा, शिस्त आणि निसर्गप्रेम" या स्काऊट अँड गाईडच्या मूलमंत्राचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि सेवाभाव अधिक दृढ केला.
