Get in on
लोणावळा : वाहनांना डार्क काळा काचा, बिना नंबर प्लेटच्या दुचाकी चालवणे, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर गाड्यांना बसवणे, नो पार्किंग मध्ये वाहने उभे करणे असे प्रकार करणार्या तब्बल 105 जणांवर
लोणावळा : लोणावळा शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व लोणावळा नगरपरिषदेने एकत्रित प्रयत्न करत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी माग�
लोणावळा : लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या 'पुराणिक सोसायटी' मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १:३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या एका बंगल्यातून मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले. लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. राहुल चोरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे शहरात विनापरवाना चालणाऱ्या बंगल्यांच्या व्यवसायावर आणि पर्यटकांच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व लोणार शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयुर आबनावे, भुषण कुंवर, राहुल चोरघे, प्रिती गवारी, प्राजक्ता सुतार, सतिश घोंगडे, तुषार शिंदे, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली.
लोणावळा : आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यांत साठवून विवाहाच्या तयारीत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा लोहगड किल्ल्यावर पाय घसरून दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अगरवाल (रा. लोढा, गहुंजे, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे गहुंजे परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. केतनचा विवाह येत्या १४ तारखेला जयपूर येथे एका आलिशान पॅलेसमध्ये थाटामाटात होणार होता. या विवाह सोहळ्याची सर्व जय्यत तयारी पूर्ण झाली होती. लग्नासाठी विमान तिकिटेही काढण्यात आली होती. याच आनंदाच्या वातावरणात, गुरुवारी केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ला पाहताना आणि छायाचित्रे (सेल्फी) काढत असताना अचानक केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्नघटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. लोणावळा ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर 'शिवदुर्ग मित्र लोणावळा' आणि 'वन्यजीव रक्षक मावळ' या संस्थांच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असतानाही बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या बचावकार्यात आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना कराळे, राजू कडू, योगेश दळवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. लग्नाच्या उंबरठ्यावर असतानाच घडलेल्या या भीषण अपघातामुळे अगरवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मावळ भागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळल्याची घटना आज घडली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील कि.मी. ४२.००० जवळील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे ५० फूट उंचीवर सुमारे ५ टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत (रॉक फॉल बॅरियर) अडकून राहिल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली. या संदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य झाले.या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे-मंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते, आयआरबी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि संरक्षक जाळी उभारणाऱ्या मेकाफेरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे साईट इंजिनिअर अक्षय परशिया व अभिजीत सावंत यांनी त्यांच्या तांत्रिक पथकासह ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.संपूर्ण कारवाईदरम्यान पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि तांत्रिक पथक यांच्या अचूक समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी अथवा अपघात घडला नाही. दुपारी १.४० वाजेपर्यंत दगड सुरक्षितरीत्या खाली उतरवून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या संयुक्त आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या सतर्कतेचे, कार्यतत्परतेचे आणि समन्वयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
