Get in on
लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा शहरात अंबरवाडी फाट्याजवळ दोन हाय प्रोफाईल कारची धडक आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी द�
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी लोणावळा शहराला मान्सूनच्या प्रतीक्षेचे वेध लागले आहेत. मागील वर्षी मे महिन्यामध्ये मान्सूनला सुरुवात झाली व 17 जून रोजी लोणा�
खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे. अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणानी सहभाग घेतला.
कामशेत : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाचा मेळ बसल्यास ते कोणतीही मोठी कामगिरी करू शकतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा मावळ तालुक्यात आला आहे. तालुक्यांतील चिखलसे गावचा सुपुत्र कु. राजवीर विजय काजळे याने आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर 'आदर्श सैनिक स्कूल, सोलापूर' येथे ओबीसी (OBC) प्रवर्गातून निवड सार्थ ठरवत एक दमदार झेप घेतली आहे. भविष्यात भारतीय सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी बनण्याच्या त्याच्या स्वप्नाकडे हे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे यशस्वी पाऊल मानले जात आहे.लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न!राजवीरला लहानपणापासूनच देशसेवेची प्रचंड आवड आणि सैन्यदलाबद्दल मोठे आकर्षण आहे. हेच स्वप्न उराशी बाळगून त्याने अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या सैनिक शाळेच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या बळावर त्याने या कठीण प्रवेश परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. अत्यंत चुरशीच्या या प्रक्रियेत बाजी मारत राजवीरने केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर चिखलसे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.माता-पित्यांचे संस्कार अन् अकॅडमीचे योग्य मार्गदर्शनराजवीरच्या या यशामागे त्याचे कुटुंब आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्याचे वडील श्री. विजय रामचंद्र काजळे (M.Com.) हे शेती व्यवसायात कार्यरत आहेत, तर माता सौ. कल्याणी विजय काजळे (HSC) या गृहिणी आहेत. ग्रामीण भागात राहूनही मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू न देता, पालकांनी त्याला दिलेले प्रोत्साहन, संस्कार आणि केलेल्या त्यागामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना काजळे कुटुंबीयांनी व्यक्त केली. यासोबतच, राजवीरला 'गोरे सर्स सैनिक स्कूल मार्गदर्शन अकॅडमी, तळेगाव दाभाडे' यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीमध्ये मिळालेले योग्य नियोजन, स्पर्धा परीक्षेची अचूक तयारी आणि अभ्यासाची लागलेली गोडी यामुळेच राजवीरला ही यशाची शिखरे पादाक्रांत करता आली.मावळ परिसरातून अभिनंदनाचा वर्षावसैनिक शाळेत प्रवेश मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते. त्यामुळे राजवीरची सोलापूरच्या आदर्श सैनिक स्कूलमध्ये झालेली ही निवड केवळ काजळे परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण मावळ परिसरासाठी गौरवपूर्ण ठरली आहे. भविष्यात भारतीय सशस्त्र दलात (Indian Armed Forces) अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचा राजवीरचा मानस आहे. राजवीरच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संपूर्ण काजळे परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, चिखलसे ग्रामस्थ तसेच गोरे सर्स सैनिक स्कूल मार्गदर्शन अकॅडमीच्या वतीने त्याचे जाहीर कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पुणे : पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात योग क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याबद्दल सूक्ष्म योगा फाउंडेशनचे संस्थापक पंकज अनिल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूक्ष्म योग फाउंडेशनच्या माध्यमातून पंकज शर्मा यांनी योग, ध्यान, प्राणायाम आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. विशेषतः त्यांनी राबविलेल्या ‘योग सेवा अभियान’ या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील विविध भागांमध्ये ९० दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले. या अभियानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत योग पोहोचला असून, हजारो नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ झाला आहे. याशिवाय शाळांमध्ये मोफत योग शिक्षण, महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम, तसेच युवकांमध्ये मानसिक सुदृढतेसाठी कार्यशाळा असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना पंकज शर्मा म्हणाले, "हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, या ध्येयाने आम्ही काम करत आहोत. ‘योग सेवा अभियान’ सारख्या उपक्रमांद्वारे समाज अधिक निरोगी आणि सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील." या सन्मानामुळे सूक्ष्म योग फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, समाजामध्ये आरोग्य आणि जागरूकतेचा संदेश अधिक व्यापक पद्धतीने पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोणावळा : नेपाळचे राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने आणि लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुबोध तिवारी यांची नुकतीच नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट झाली. भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे नेते रवी लामिछाने यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमधील योगिक संबंध अधिक दृढ करण्यावर आणि विशेषतः नेपाळमध्ये योगप्रसाराला गती देण्यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. या भेटीदरम्यान श्री. सुबोध तिवारी यांनी श्री. रवी लामिछाने यांना लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेच्या गौरवशाली कार्याची आणि संस्थेच्या शतकपूर्ती (१०० वर्षे) महोत्सवाची माहिती दिली. कैवल्यधामने गेली अनेक दशके वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पातळीवर योगाचा प्रचार-प्रसार कसा केला, यावर चर्चा झाली. रवी लामिछाने यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याशी संवाद साधण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी होता, अशा भावना तिवारी यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी श्री. सुबोध तिवारी यांच्या हस्ते रवी लामिछाने यांना भारताचा समृद्ध योगिक वारसा आणि 'इंडियन योग असोसिएशन'चे एक ज्ञान, अनेक परंपरा (One Wisdom, Many Traditions) हे विशेष प्रकाशन सन्मानपूर्वक भेट देण्यात आले. योगाचे विविध मार्ग कसे एकाच उद्देशासाठी एकत्र येतात, याचा उत्तम पुरावा देणारे हे प्रकाशन पाहून लामिछाने अत्यंत प्रभावित झाले.*भारत-नेपाळ योग संबंध: चर्चेतील ३ महत्त्वाचे निर्णय*१. नेपाळमधील १०० शिक्षक लोणावळ्यात येणार : नेपाळमधील १०० शिक्षकांचा एक मोठा वर्ग लवकरच लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेत विशेष योग प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.२. कैवल्यधामचे तज्ज्ञ नेपाळला जाणार : आगामी काळात कैवल्यधाम संस्थेतर्फे थेट नेपाळमध्ये योग प्रशिक्षण शिबिरे आणि उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी कैवल्यधामचे वरिष्ठ योग तज्ज्ञ आणि मार्गदर्शक नेपाळचा दौरा करणार आहेत.३. श्री. रवी लामिछाने लोणावळ्याला भेट देणार : स्वतः नेपाळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने यांनी आगामी ६ महिन्यांत लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. *योगाच्या माध्यमातून भारत आणि नेपाळचे हे 'योगमय' नाते आगामी काळात अधिक वृद्धिंगत आणि घट्ट होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली ही भेट आणि चर्चा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली बाब आहे. – श्री. सुबोध तिवारी (मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी, कैवल्यधाम योग संस्था)*
