Get in on
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड पडल्याने कारची काच फुटून अपघात झाल्याची घटना आज (२९ जून) सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणाल�
लोणावळा : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची भावी पत्नी सिया गोयल व तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज 29 जून रोजी संपत असल्याने त्यांना वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी ५ दिवसांची (३ जुलैपर्यंत) वाढ केली आहे. तपासातील अनेक महत्त्वाच्या आणि शिल्लक बाबींचा छडा लावण्यासाठी ही कोठडी मंजूर करण्यात आली आहे.सरकारी वकील आणि पोलिसांचा न्यायालयात जोरदार युक्तिवादसोमवारी दुपारी ठीक तीन वाजता दोन्ही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. ही मागणी करताना सरकारी वकील म्हणाले, गुन्ह्याचा कट आणि रेकी : आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, हा कट नेमका कुठे बसून रचला आणि त्यांनी लोहगडावर जाऊन आधी रेकी केली होती का? याचा तपास करणे बाकी आहे.प्री-वेडिंग शूट आणि पासपोर्टचे रहस्य : सियाला केतनसोबत बाली येथे प्री-वेडिंग शूटला जायचे नव्हते. याच कारणास्तव तिने पासपोर्ट फाडले होते. आता पोलिसांना या प्रकरणात केतनचा बेपत्ता असलेला पासपोर्ट शोधायचा आहे.गुन्ह्याचे नाट्य रूपांतर (Recreation) : गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी सियाप्रमाणेच आता चेतन चौधरीलाही घटनास्थळी (लोहगड किल्ला) घेऊन जाऊन गुन्ह्याचे नाट्य रूपांतर (सीन रिक्रिएशन) करायचे आहे. तसेच त्यांनी लोहगडावर आणखी कोणाशी संवाद साधला होता, याचा शोध घ्यायचा आहे.मोबाईल डेटा रिकव्हरी : केतनचा मोबाईल मृत्यूच्या काही काळानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असून, तो रिकव्हर करायचा आहे. आरोपींनी अनेक गोष्टी लपवून ठेवल्या असून त्या हस्तगत करणे गरजेचे आहे.या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करायचा असल्याने पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.आरोपींच्या वकिलांचा प्रतियुक्तिवाददुसरीकडे, आरोपी सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध केला. आरोपींना केलेली अटक कायद्याला धरून आहे का? आमचा अर्ज आधी दाखल करून घ्या, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.या प्रकरणातील तांत्रिक तपास, चौकशी आणि नाट्य रूपांतर आधीच झाले आहे. आता पुढील तपास पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची कोणतीही गरज नाही. केवळ केतनच्या आई-वडिलांच्या म्हणण्यावरून याला 'हत्या' म्हणता येणार नाही, हा दरीत पडून झालेला मृत्यू असू शकतो. तसेच हा गुन्हा जामीनपात्र स्वरूपाचा असल्याने कोर्टाने पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद व आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने तपासातील शिल्लक बाबींचे गांभीर्य लक्षात घेतले. केवळ तांत्रिक तपास उरला नसून गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे (जसे की केतनचा पासपोर्ट आणि मोबाईल डेटा) हस्तगत करणे आणि गुन्ह्याचे मूळ शोधणे गरजेचे असल्याचे मानत, न्यायालयाने आरोपींची ३ जुलैपर्यंत म्हणजेच ५ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. आता या ५ दिवसांच्या वाढीव कोठडीत पोलीस या हाय-प्रोफाईल प्रकरणातील कोणते नवीन धागेदोरे समोर आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोणावळा : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया गोयल व चेतन चौधरी यांना 3 जुलै पर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर आज बुधवारी सकाळी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस मोठ्या बंदोबस्तात लोहगडावर दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल व अन्य अधिकारी देखील गडावर हजर होते. 18 जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीमध्ये पडून मयत झाला होता. तपासात पुढे हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर या तपासाला कलाटणी मिळाली व तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. केतन अग्रवाल सोबत लोहगडावर गेलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिला याप्रकरणी मुख्य आरोपी करण्यात आले तर तीचा मित्र चेतन चौधरी याला देखील आरोपी करण्यात आले आहे. दोघांनी मिळून हा हत्येचा कट रचत लोहगड किल्ला येथून केतनला दरीमध्ये धकलून दिले असल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. यानंतर ही घटना कशी घडली याचा सिन पुन्हा तयार करण्यात आला. 28 जून रोजी सिया ला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर गेले होते. 18 जून रोजी झालेला घटनाक्रम तिच्याकडून पुन्हा करून घेण्यात आला. आज 1 जुलै रोजी चेतना ला लोहगडावर पोलीस घेऊन गेले होते. सिया ने दिलेली माहिती व चेतनच्या सीन रिक्रेशन मध्ये जुळते का याची उलट तपासणी यामध्ये करण्यात आली. सकाळी 11 वाजेपर्यंत लोहगड किल्ला नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सीन रिक्रेशन संपल्यानंतर सकाळी 11 वाजता किल्ला नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. लोहगडवरून चेतन चौधरी याला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : “आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर प्रभावी नियंत्रणासाठी खोपोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग, प्रतिबंध आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी केले.महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या विशेष शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. विशाल नेहूल होते. आपत्तीसमयी त्वरित प्रतिसाद देणे, संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.सर्व यंत्रणांचा व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, यशवंती हायकर्स, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र संघटना आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, औद्योगिक क्षेत्रातील गॅस गळतीसारख्या आपत्ती आणि महामार्गावरील अपघात अशा विविध संकटांच्या वेळी कोणती उपाययोजना करावी, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला. “संकटावर करू मात, देऊ एकमेकांना खंबीर साथ” हा संदेश यावेळी उपस्थितांमध्ये प्रभावीपणे रुजवण्यात आला.मान्यवरांचे मार्गदर्शन आणि समन्वयाचे आवाहनशिबिरात खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, परिवहन सभापती किशोर पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन घरत यांनी आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग, आवश्यक समन्वय आणि सर्व घटकांनी एकत्रितपणे कसे कार्य करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस दलाकडे आधुनिक संसाधने सज्ज: डॉ. विशाल नेहूलअध्यक्षीय भाषणात डॉ. विशाल नेहूल म्हणाले की, "खोपोलीतील प्रशासन, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये संकटसमयी एकजुटीने कार्य करण्याची एक सशक्त परंपरा आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाला आधुनिक संसाधने आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे."'वेळेपूर्वीची तयारी' हेच प्रभावी शस्त्र: पोलीस निरीक्षक सचिन हिरेखोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात “प्रतिबंध, सावधगिरी आणि पूर्वतयारी” या त्रिसूत्रीवर भर दिला. ते म्हणाले की, कोणतेही संकट अचानक येते; मात्र त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वेळेपूर्वीची तयारी, जागरूकता आणि समन्वय हेच आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांनी सर्व घटकांना पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले.बचाव साहित्यांचे थेट प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनशिबिरादरम्यान पीएसआय पूजा चव्हाण यांनी खोपोली पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या आपत्कालीन संसाधनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनकडील विविध बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी नगरपालिकेची फायर ब्रिगेड व्हॅन, फायर मॅन बाईक, गोरखा व्हॅन तसेच स्वामिनी संस्थेची ॲम्ब्युलन्स यांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पीएसआय ज्ञानेश्वर एडवले यांनी केले.खोपोलीकरांचा खंबीर निर्धारआपत्ती व्यवस्थापनात वेळेवर मिळणारा प्रतिसाद, संसाधनांचे योग्य नियोजन, समन्वयाची मजबूत साखळी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या शिबिराने सर्वांना करून दिली. आगामी काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा धैर्याने व सक्षमपणे सामना करण्यासाठी खोपोली पोलीस आणि नागरिक पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
