Get in on
लोणावळा : NBNCOCS यांच्या वतीने आंतरवर्गीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २ सप्टेंबर २०२६ रोजी सिंहगड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, लोणावळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या स्पर्धेत विविध वर्गा
लोणावळा : लोणावळा शहरात ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत 5193 मिमी (204.45 इंच) इतका पाऊस झाला आहे. 1 सप्टेंबर 2026 रोजी 24 तासात शहरात 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस
लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळ्यातील वलवण बाराबंगला परिसरात एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोने-चांदीचे दागिने, हिरे आणि रोख रकमेसह एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:४५ ते ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास वलवण येथील 'गजल बंगलो, बाराबंगला' परिसरात घडली. अज्ञात चोराने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने बंगल्याच्या मागील कंपाउंडवरून आत प्रवेश केला. त्यानंतर पत्र्याच्या शेडवरून गॅलरीत जाऊन, गॅलरीचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी साह्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवज चोरून पोबारा केला. सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच दीड लाख रुपये रोख असे एकूण 14 लाख 15 हजार रुपयांची चोरी या ठिकाणी झाली आहे. या प्रकरणी फिर्यादी निलेश श्रीकृष्ण वर्तक (वय ५६, रा. सह्याद्री फार्म्स, वलवण, लोणावळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (A) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (PSI) चंदनशिव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कार्ला : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून त्याचा प्रभावीपणे अध्यापनासाठी वापर करावा, या उद्देशाने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शंभर टक्के शिक्षकांना ‘AI’चे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मावळातील तब्बल ८०० जिल्हा परिषद शिक्षकांना AI तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जात आहे. दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे हे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि पंचायत समिती मावळच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोसॉफ्ट व रोबोटेक्स इंडिया यांच्या ‘Elevate for Educators’ उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पार पडत आहे.अध्यापन अधिक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण करण्याचा उद्देशजिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात सक्षम व्हावा, अध्यापन पद्धती अधिक प्रभावी, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित व्हावी तसेच विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील आवश्यक कौशल्यांशी जोडता यावे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. AIच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य निर्मिती, अध्यापनाचे नियोजन, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक उपक्रम तयार करणे आदी बाबींमध्ये शिक्षकांना तंत्रज्ञानाचा सुलभ उपयोग करता यावा, यासाठी हे विशेष सत्र आयोजित केले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, प्राध्यापक डॉ. मिलिंद ओव्हाळ, केंद्रप्रमुख सविता क्षीरसागर, संगीता भालघरे, श्री. वाघमारे, मुकुंद तनपुरे तसेच सुहास विटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रमोद पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. "आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज असून, शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य व प्रभावी वापर अध्यापनामध्ये करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.तज्ज्ञ सुलभकांकडून मार्गदर्शन व नियोजनप्रशिक्षणासाठी रोबोटेक्स इंडियाच्या प्रोग्राम लीड रेवती फणसे यांच्यासह स्वरांगी गायकवाड, गौरव कुमार, आदिती पाटील, यश पुंड आणि मोहित वाकोडे यांनी सुलभक म्हणून जबाबदारी पार पाडली. या आयोजनासाठी मुकुंद तनपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून विषय साधन व्यक्ती सुचिता भोई आणि आरती कुंडले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भोई यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास विटे यांनी मानले. या प्रशिक्षणामुळे मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या तांत्रिक क्षमतांना मोठी चालना मिळणार असून, वर्गातील अध्यापनात AI चा जबाबदार वापर झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गडचिरोली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला. शिवसेना नेते व सचिव मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्तकमलाने जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. महेश केदारी यांच्यासह पक्षाचे राज्यातील व स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेले तालुकाप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे परिसर भगवामय झाला होता.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाला गती देण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पक्षाशी आणि ठाकरेंच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.
