Get in on
लोणावळा : मागील महिनाभर जोरदार कोसळल्यानंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात लोणावळा शहरात 21 मिमी (0.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्
लोणावळा : आखाड पार्ट्या करण्यासाठी लोणावळा शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे शहरातील सर्व पर्यटन स्थळे गजबजली असून हॉटेल, फार्म हाऊस व खाजगी बंगले हे पर्यटका�
लोणावळा : खंडाळा येथील प्रसिद्ध राजमाची पॉईंट परिसरात नाष्टा करत असलेल्या पर्यटकाचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत सुमारे २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर याला अटक करण्यात आली आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील राजमाची पॉईंटवरील एका स्टॉलवर पर्यटक नाष्टा करत असताना त्याचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल कंपनीचे मोबाईल, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स आणि इतर साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २५ जुलै २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुगल पे व्यवहारांची माहिती आणि स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास केला. तपासादरम्यान संबंधित खातेदाराचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता मिळाल्यानंतर मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपी सध्या कल्याण येथील मानपाडा परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने लोणावळा शहर पोलिसांचे पथक मानपाडा पोलीस ठाणे, कल्याण येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून हरिदास बाळू कोळेकर याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने सदर चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल मोबाईल फोन, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा शाईन दुचाकी (क्रमांक : MH-03-FG-3349) असा एकूण २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार संदीप दगडू मानकर, पोलीस शिपाई नागेश कमठणकर, होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी केली.
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील पाटण गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर बाधित नागरिकांच्या मदतीसाठी मा. मंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतला आहे. दरडग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह त्यांनी मुंबईतील सेवासदन निवास येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाटणमधील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. दरडग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत भेगडे यांनी पाटण गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, दरडीमुळे निर्माण झालेला धोका आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली. दरडग्रस्तांना शासकीय मदत आणि प्रशासनाचा त्वरित प्रतिसाद मिळावा, यासाठी त्यांनी शासनाकडे ठोस पाठपुरावा केला. या चर्चेची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी तात्काळ संपर्क साधत आवश्यक सूचना दिल्या. बाधित कुटुंबांना तातडीने दिलासा देणे, पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीदरम्यान दरडग्रस्त भागातील भौगोलिक परिस्थिती, संभाव्य धोके, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन पुनर्वसनाचा आराखडा यावरही सखोल चर्चा करण्यात आली. प्रभावित कुटुंबांना कोणतीही अडचण येऊ नये आणि शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सातत्याने समन्वय ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच दरडग्रस्त नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासन सकारात्मक असून प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री महाजन यांनी दिली. दरम्यान, पाटण गावातील ग्रामस्थांनीही बाळा भेगडे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले. घटना घडल्यानंतर त्यांनी दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवत संबंधित मंत्र्यांची तातडीने भेट घेतल्याने मदत प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. “संकटाच्या काळात आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आमचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवला. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.“पाटणमधील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणे हीच आमची प्राथमिकता आहे. संकटाच्या या काळात कोणतेही कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. दरडग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळवून देण्यासोबतच त्यांचे सुरक्षित पुनर्वसन होईपर्यंत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. नागरिकांना या कठीण प्रसंगी कधीही एकटे पडू देणार नाही.”- बाळा भेगडे (मा. राज्यमंत्री भाजपा)
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोलीच्या स्काऊट अँड गाईड तुकडीने खोपोली शहरातील लौजी गावात आयोजित केलेल्या समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वर्षा सहलीच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. तब्बल १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमात स्वतःच्या खाऊसाठी मिळणारे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी आदिवासी कुटुंबांसाठी गृहपयोगी साहित्य खरेदी करून त्याचे वितरण केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लौजी गावच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित वर्षा सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्त, सांघिक भावना आणि निसर्गप्रेमाचा अनुभव घेतला. त्यानंतर लौजी गावातील आदिवासी बांधवांना आवश्यक गृहपयोगी साहित्य तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातून संकलित केलेले वापरण्यायोग्य कपडे वितरित करण्यात आले. 'सेवा हीच खरी साधना' या भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सॅनियो स्पेशल स्टील कंपनीच्या (मस्को) सहकार्याने उपलब्ध झालेल्या फळ-फुलझाडे तसेच विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. "एक पॅट्रोल - एक वृक्ष" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. या उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी लौजी गावातील इतिहासप्रसिद्ध विहिरीलाही भेट दिली. विहिरीच्या ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी स्थानिक इतिहास, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलव्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेतले. कार्यक्रमासाठी हेल्प फाउंडेशन, खोपोलीचे संस्थापक गुरुनाथ साठेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समाजाभिमुख विचारांचे कौतुक करत, "समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि संवेदनशीलता हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची ओळख आहे. अशा उपक्रमांमधूनच देशाला जबाबदार आणि सुजाण नागरिक मिळतात," असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी कारमेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, लौजी ग्रामस्थ किशोर पाटील, अरुण पाटील, राम पाटील, जनता विद्यालय, लव्हेजच्या मुख्याध्यापिका संगीता पवार, ग्रामस्थ तसेच आदिवासी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, सिस्टर सिमी, रेश्मा जाधव, जयसिंथा आणि समीर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. "सेवा, शिस्त आणि निसर्गप्रेम" या स्काऊट अँड गाईडच्या मूलमंत्राचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि सेवाभाव अधिक दृढ केला.
