पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ आयटीआय विद्यार्थिनींनाही मिळावा – वैभव सोलणकर यांची मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांकडे मागणी

पुणे | प्रतिनिधी (विलास गुरव) : शालेय विद्यार्थिनींसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा लाभ आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनाही मिळावा, अशी ठाम मागणी आयटीआय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे महामंत्री वैभव सोलणकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सध्या या योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना एसटी बसचा मोफत मासिक पास दिला जातो. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेतच पास मिळण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी, त्यात आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना समाविष्ट करण्यात आलेले नाही, ही बाब खेदजनक असल्याचे सोलणकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “आयटीआय हे तांत्रिक शिक्षणाचे केंद्र असून, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी रोज दूरवरून ये-जा करतात. त्यामुळे बस भाड्याचा मोठा बोजा पालकांवर येतो. जर बारावीपर्यंत सवलत दिली जात असेल, तर तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या आयटीआय विद्यार्थिनींनाही ही सुविधा दिली गेली पाहिजे.”
या पार्श्वभूमीवर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा विस्तार करून आयटीआय विद्यार्थिनींनाही मोफत बस पासची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी अधिकाधिक जोर धरू लागली आहे. वैभव सोलणकर यांनी लवकरच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी देखील संपर्क करून या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे संकेत दिले आहेत.