नलावडे बंधाऱ्याचे काम पूर्ण; चिपळूणला पुरापासून दिलासा; आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण (प्रतिनिधी / विलास गुरव) : चिपळूण शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणारे नलावडे बंधाऱ्याचे काम अखेर पूर्ण झाले असून, या वर्षी झालेल्या जोरदार पावसात या बंधाऱ्याचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवला आहे. या कामामागे आमदार शेखर निकम यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम आमदार निकम यांनी महायुती शासनाच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून अवघ्या दहा महिन्यांत पूर्णत्वास नेले. यामुळे पावसाळ्यात नलावडे परिसरात पाणी साचणे आणि पूरपरिस्थिती निर्माण होणे टळले असून, स्थानिक नागरिकांनी याचा मोठा दिलासा व्यक्त केला आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसात बंधाऱ्याच्या कार्यक्षमतेची प्रत्यक्ष झलक पाहायला मिळाली. पाणी अडचणीशिवाय वाहून गेल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. कोणताही गाजावाजा न करता, श्रेय न घेता ‘जनतेचा सेवक’ म्हणून कार्यरत राहण्याचा आपला निर्धार असल्याचे आ. शेखर निकम यांनी नमूद केले आहे. त्यांचे साधेपण, कार्यक्षमता आणि लोकहिताची भावना चिपळूणवासीयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.