जयहिंद फाऊंडेशनतर्फे कोल्हापुरात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान; आमदार शेखर निकम यांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी - विलास गुरव) :
जयहिंद फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर वीर पत्नी, माता आणि कुटुंबातील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास आमदार शेखर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जयहिंद फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की, "शहीद सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी फाऊंडेशन जे कार्य करत आहे, ते निश्चितच प्रेरणादायी असून देशभक्तीचा खरा सन्मान आहे." तसेच, त्यांनी हुतात्मा कुटुंबांप्रती आपल्या भावना व्यक्त करत, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे स्मरण करून दिले.
“भारतीय लष्करातील प्रत्येक जवान हा भारताच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि अतूट देशभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला स्वाभिमानाने जगता येते,” असे गौरवोद्गार आमदार निकम यांनी काढले.
या कार्यक्रमात जयहिंद फाऊंडेशनच्या वतीने शहीद जवानांच्या स्मरणार्थ व त्यांच्या कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली. "हे उपक्रम म्हणजे शहीदांना वाहिलेली खरी मानवंदना आहे," असेही आमदार निकम यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंत मोरे, कॅप्टन (मानद) शंकरराव पाटील, जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल अनपट, राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, राष्ट्रीय संचालक केशव राजपुरे तसेच शहीद कुटुंबातील सदस्य आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.