चर्चा तर होणारच ! मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल ते अंडा पॉईंट दरम्यान खड्डेच खड्डे; रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे अक्षम्य दुर्लक्ष

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल ते अंडा पॉईंट दरम्यान संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले असताना व वारंवार या ठिकाणी अपघात घडत असताना देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीचे याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असताना देखील त्या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करणारी आयआरबी कंपनी व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळ वाहन चालकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटरी हिल ते अंडा पॉईंट दरम्यानचा संपूर्ण रस्ता हा लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी प्रवासी व वाहनचालक करत आहेत.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. खोपोली लोणावळा दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार चाकी गाड्या व प्रवासी बस यांच्यासह स्थानिक वाहनांची सातत्याने वर्दळ असते. दुचाकी देखील या मार्गावरून सतत प्रवास करत असतात या सर्वांना या खड्ड्यामुळे रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अनेक वेळा वाहने या खड्ड्यांमध्ये आढळतात वाहनांचा वेग कमी होतो व अपघात होत असतात. मागील काही महिन्यांपासून दैनंदिन हा खेळ सुरू असताना देखील या रस्त्यावरून नित्यनेमाने ये जा करणारे आय आर बी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांना हे खड्डे कसे दिसत नाहीत हा एक मोठा प्रश्नच आहे. टोल वसुली करत असताना वाहन चालकांना वाहतूक योग्य रस्ते निर्माण करून देणे हे या कंपन्यांचे काम असताना या कंपन्या मात्र कामात हलगर्जीपणा करत आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वर रोज सायंकाळी, रात्री व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अनेक वाहन चालक मोठ्या प्रमाणात जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात या सर्वांना या खड्डेमुळे रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेत लवकरात लवकर पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून घ्यावा व वाहन चालक प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.