महत्वाची सूचना l कार्ला मळवली दरम्यानच इंद्रायणी नदीवरील कच्चा मातीचा पूल आज रात्री 11 ते पहाटे दरम्यान दुरुस्ती कामासाठी बंद राहणार
![](../images/original/1718198084049.jpg)
कार्ला (प्रतिनिधी) : कार्ला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील कच्चा मातीचा तात्पुरता बनवण्यात आलेला पूल हा पाण्याच्या मोठ्या मोर्या टाकण्याच्या कामासाठी आज रात्री 11 वाजल्यापासून पहाटे दरम्यान बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या कच्च्या मातीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने तसेच जलपर्णी देखील या पुलावर आली आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाची माती वाहून जाऊ लागल्याने सदरचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याकरिता सदर पुलाला मोठ्या मोर्या टाकत त्याची उंची वाढवण्यात येणार आहे.
या कामासाठी आज रात्री अकरा वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कार्ला मळवली दरम्यानच्या इंद्रायणी नदीवरील मोठ्या पुलाचे काम येथे पंधरा दिवसात युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये नागरिकांना वाहतुकीसाठी कच्च्या मातीच्या पुलावरून प्रवास करावा लागणार आहे. सदर पुलाची उंची कमी असल्याने तो पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. याकरिता सदरच्या पुलाची उंची वाढवण्यात येणार असून पाणी वाहून जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या मोरया टाकण्यात येणार आहे. या कामासाठी सदर पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.