Lonavala News l अदृश्य असलेले मन हे कुरूक्षेत्र आणि शांतीचेही अधिष्ठान - ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरिजी महाराज

लोणावळा : अदृश्य असलेले मन हे अतिशय चंचल असते. त्या चंचल मनावर ताबा मिळवणे हे उसळलेल्या घोड्यावर नियंत्रण मिळवण्यासारखे असते. मन हे सिध्दीस नेण्याचे साधन ठरू शकते, तर अधोगती होण्याचे निमित्त देखील होऊ शकते. म्हणून बुध्दीसह मनावर देखील संस्कार आणि प्रयोग होणे आवश्यक आहे. कारण मन हे कुरूक्षेत्र आणि शांतीचेही अधिष्ठान असते, असे मत ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान, अध्यात्म आणि व्यावहारिकता यांचा मेळ घालून कार्य करणाऱ्या लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन गुरुवारी ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
लोणावळा येथील मनशांती केंद्रात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक व साहित्यिक विजय कुवळेकर, मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे आणि मनशक्ती संशोधक केंद्राचे प्रमुख गजानन केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरिजी महाराज म्हणाले की, आधुनिक विज्ञानाने देखील प्रयोगाअंती अनेक शोध लावले. परंतु, मनावर प्रयोग करणारे विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रयोग सिध्दीस गेल्याचे अजून तरी ऐकीवात नाही. या मनशक्ती केंद्रात अचल आणि अदृश्य असलेल्या मनावर होणारे प्रयोग आणि ते सिध्दीस जाण्याचे प्रमाण पाहता मन अचंबित होते आणि हरखून जाते. ज्याप्रमाणे योग पुरूष आणि संन्यासी सूर्य मंडलाला भेदून जातात, त्याच पध्दतीने समाजात निर्माण होणाऱ्या अपप्रवृत्तींविरूध्द लढणारा तसेच याविरूध्द लढता लढता कुरूक्षेत्रावर देह ठेवणारा योध्दा देखील हे सूर्य मंडल भेदून जातो.
स्वामी विज्ञानानंद यांनी या केंद्रात केवळ मनावर काम केले नाही, तर येथे त्यांनी राष्ट्र भक्तीचे संस्कार केले. मनाला देखील संस्कार करता येतात, मनाला वळण लावता येते, त्याचे मापन करता येते हे या केंद्राला भेट दिल्यावर लक्षात येते. स्वामीजींनी सुरू केलेल्या कार्यामध्येच नवीन कार्यांची बीजे रूजलेली होती. त्यामुळे आज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना शताब्दीकडे देखील ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करेल, असा मला विश्वास वाटतो असे त्यांनी सांगितले. राष्ट्र उत्थानासाठी सुदृढ आणि सुसंस्कारीत पिढी घडणे आवश्यक आहे, हे स्वामीजींनी खूप आधीच जाणले असल्याने त्यांनी दूरदृष्टी ठेवून खूप आधीच कार्यास प्रारंभ केला. मनशक्ती केंद्र हे ज्ञानतीर्थ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. यावेळी बोलताना विजय कुवळेकर म्हणाले की, स्वामी विज्ञानानंद यांनी प्रकाश समाधी घेतल्यानंतर या कार्यास ओहोटी लागेल, अशी चर्चा होती. परंतू प्रमोदभाई शिंदे आणि गजानन केळकर या दोघांनी आपल्या कार्यातून त्या सगळ्या शंका दूर केल्या.स्वामी विज्ञानानंद हे अद्भूत व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कार्याचा कधीच गाजावाजा केला नाही. राष्ट्र, समाज आणि व्यक्ती बलशाली होण्यासाठी मन संस्कारीत आणि सामर्थ्यवान बनले पाहिजे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि त्या दिशेने त्यांनी कार्य केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाव्दारे मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मनशक्ती संशोधक केंद्राचे प्रमुख गजानन केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, तर विश्व कल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.