Breaking news

अपघात ब्रेकिंग : द्रुतगती मार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांना धडक; 1 ठार तर पाच जण जखमी

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी रात्रीपासून 11.15 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने सहा वाहनांना धडक दिली. या भिषण अपघातात 1 जणाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. 36/800 जवळ हा अपघात झाला. यामध्ये कंटेनर क्र.  RJ-19-GH-4497 हा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असताना किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर ब्रेक फेल झाला. त्याने इको कार क्र MH- 03- DA- 8233,  क्रेटा कार क्र. MH - 43- BN- 9114, टाटा जेस्ट कार क्र.MH -14 - EU -352, हुंडाई कार क्र. MH -47-K- 6112 किया कार क्र.MH 03- EB-9777 आणि स्विफ्ट कार  MH 02- BM- 9022 या वाहनांना धडक दिली. 

     कंटेनर ची धडक एवढी जबरदस्त होती की, धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हालविण्यात आले. त्या दरम्यान हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सुभाष पंढरीनाथ चौगुले (वय 45 राहणार वाशी, नवी मुंबई) हे मयत झाले असून चंद्रकला सुभाष चौगुले (वय 43, रा. वाशी), अमित कुमार श्रीहरिराम थठेर (वय 30, रा. भांडुप), कौसर अली शाह (वय 40, रा. भांडुप), आफताब समीउल्ला आलम (वय 19, रा भांडुप), अफसर अली मोहम्मद अली (वय 36, रा. वडाळा) हे जखमी झाले आहेत.

    सदर कंटेनर अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचून  घटनेची माहिती घेतली. अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने दाखवलेल्या सतर्कतेबद्दल तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले आहे.

इतर बातम्या