चर्चा तर होणारच! लोणावळ्यात दुर्घटनेनंतर देखील धोकदायक पर्यटन सुरूच; पर्यटक थेट उतरल्यात भुशी धरणाच्या पाण्यात

लोणावळा : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या भुशी धरणात मागील आठवड्यात 9 जून रोजी दोन तरुण पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेला जेमतेम चारच दिवस झालेले असताना आज गुरुवारी पुन्हा भुशी धरणावर धोकादायक पर्यटन सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडली काय ? अथवा प्रशासनाने आचारसंहिता लागू केली काय ? आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जीव धोक्यात घालून धोकादायक पर्यटन करणारच असा जणू काय चंगच हौश्या नवश्या पर्यटकांनी बांधला असल्याचे चित्र समोर आले आहे.
लोणावळा शहरात पावसाळी हंगाम सुरू होताच, भुशी धरणाच्या जलाशयात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. इतर पर्यटन स्थळांवर देखील अनेक दुर्घटना घडत असतात. हे अपघातांचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर काही प्रतिबंध पर्यटकांसाठी लागू केले आहेत. यामध्ये धरण परिसरात अथवा गड, किल्ले, लेण्या याठिकाणी गेल्यानंतर कसे वागावे, काय करू नये याची आचारसंहिता घालून दिलेली असताना देखील भुशी धरणाच्या पाण्यात पर्यटक उतरून जलक्रीडा करत असल्याचे दिसून येत आहे. धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठी झाला आहे.
प्रशासनाने घेतलेले ही निर्बंध कोणत्याही व्यावसायिकांचे नुकसान करण्यासाठी नव्हे तर होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी घालण्यात आलेले आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, पर्यटकांचे अपघात होऊ नये व पर्यटन स्थळांच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये हा या मागील उद्देश आहे. प्रत्येक ठिकाणी प्रशासन उपस्थित राहू शकत नाही. याकरिता धोकादायक ठिकाणांची माहिती देण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. काही व्यावसायिक देखील पर्यटकांना सूचना देत असतात तरी देखील काही हौशी पर्यटक धोकादायक पर्यटन करत असून स्वतःच्या जीवाला धोक्यात घालतात तसेच पर्यटन स्थळाला देखील गालबोट लावत आहेत.