दुपारी 3.05 मिनिटांनी अलर्ट कॉल आला.. सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळली आहे.. अनं सुरू झाली एकच धावपळ

खोपोली (प्रतिनिधी) : रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली शहरातल्या सुभाषनगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात दिनांक 28 मे रोजी मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम.के. म्हात्रे यांनी दुपारी 3.05 वा. अलर्ट कॉल दिल्यावर अवघ्या पाचच मिनिटांत एका मागोमाग एक अशा सर्वच यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनासह सुभाष नगर परिसरात दाखल झाले. एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते. काय झाले आहे हे समजत नसल्याने सर्व चिंतेत होते. त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉकड्रीलचे आयोजन केल्याचे नोडल ऑफिसर एम के मात्रे यांनी स्पष्ट केले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या.
खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाकडून महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार, खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उप मुख्याधिकारी रणजीत पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख, खोपोली पोलिस स्टेशनचे निरीक्षक शितल राऊत आणि अधिकारी, खोपोली नगर पालिका अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान, खोपोली नगरपालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता वानखेडे आणि आशा वर्कर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, म.रा.वि.मचे अधिकारी आणि कर्मचारी, वन खात्याचे अधिकारी, मंडळ अधिकारी भरत सावंत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य त्याच प्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉकड्रीलमधे सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले.