शिक्षण क्षेत्रात क्रांती ! मावळ तालुक्यातील ८०० जिल्हा परिषद शिक्षकांना 'AI' तंत्रज्ञानाचे धडे
कार्ला : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून त्याचा प्रभावीपणे अध्यापनासाठी वापर करावा, या उद्देशाने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शंभर टक्के शिक्षकांना ‘AI’चे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मावळातील तब्बल ८०० जिल्हा परिषद शिक्षकांना AI तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जात आहे.
दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे हे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि पंचायत समिती मावळच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोसॉफ्ट व रोबोटेक्स इंडिया यांच्या ‘Elevate for Educators’ उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पार पडत आहे.
अध्यापन अधिक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण करण्याचा उद्देश
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात सक्षम व्हावा, अध्यापन पद्धती अधिक प्रभावी, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित व्हावी तसेच विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील आवश्यक कौशल्यांशी जोडता यावे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. AIच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य निर्मिती, अध्यापनाचे नियोजन, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक उपक्रम तयार करणे आदी बाबींमध्ये शिक्षकांना तंत्रज्ञानाचा सुलभ उपयोग करता यावा, यासाठी हे विशेष सत्र आयोजित केले आहे.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, प्राध्यापक डॉ. मिलिंद ओव्हाळ, केंद्रप्रमुख सविता क्षीरसागर, संगीता भालघरे, श्री. वाघमारे, मुकुंद तनपुरे तसेच सुहास विटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रमोद पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. "आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज असून, शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य व प्रभावी वापर अध्यापनामध्ये करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
तज्ज्ञ सुलभकांकडून मार्गदर्शन व नियोजन
प्रशिक्षणासाठी रोबोटेक्स इंडियाच्या प्रोग्राम लीड रेवती फणसे यांच्यासह स्वरांगी गायकवाड, गौरव कुमार, आदिती पाटील, यश पुंड आणि मोहित वाकोडे यांनी सुलभक म्हणून जबाबदारी पार पाडली. या आयोजनासाठी मुकुंद तनपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून विषय साधन व्यक्ती सुचिता भोई आणि आरती कुंडले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भोई यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास विटे यांनी मानले.
या प्रशिक्षणामुळे मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या तांत्रिक क्षमतांना मोठी चालना मिळणार असून, वर्गातील अध्यापनात AI चा जबाबदार वापर झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

















