वाढत्या उष्णतेमध्ये वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता वनविभागाचा कौतुकास्पद उपक्रम
लोणावळा : मागील काही दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच वन्य प्राण्यांना देखील या तीव्र स्वरूपाच्या उष्णतेचा त्रास जाणवत आहे. यामध्ये वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता वनविभागाच्या वतीने नैसर्गिक टाकळ व पानवट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडत वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे. शिरवता वनविभागाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ज्यांना बोलता येते असा मनुष्यप्राणी हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून घेऊ शकतो. मात्र जे मुके जीव रानावनात राहत आहेत, त्यांना या उकाड्याने असाह्य वेदना होत आहेत. अशा मुक्या व वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. याकरिता नैसर्गिकरित्या दगडांमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकळ्या व पानवटे या ठिकाणी टँकरद्वारे पाणी सोडत पाणी साठवले जात आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाच्या प्रचंड ज्वाळा लागत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. अशातच वन्यजीवांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता सदरचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. सर्व ठिकाणी याच धर्तीवर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागरिकांनी देखील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी व पक्षांसाठी आपल्या घराच्या अंगणामध्ये, टेरेसवर किंवा जिथे शक्य असेल त्या ठिकाणी एखाद्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी या मुक्या प्राण्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास आजच्या लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात या मुक्या प्राण्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वनविभागाच्या या उपक्रमाच्या वन्यजीव संस्था मावळ यांनी कौतुक केले आहे.