Maval Loksabha Election | संजोग वाघेरे यांच्या प्रचाराला मावळात मिळतोय जोरदार पाठिंबा
मावळ माझा न्युज नेटवर्क : मागील दहा वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात दाखविण्यासारखे एकही काम न केल्याने सर्वात अपयशी ठरलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मावळातील जनता एकवटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रचाराला मावळात जोरदार पाठिंबा मिळू लागला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे यांनी सांगितले. मावळातील मुस्लिम समाज देखील त्यांच्या प्रचारार्थ एकवटला असून त्यांनी वाघेरे यांना पाठिंबा दर्शविला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला माझ्या विरोधात देण्यासाठी स्वतःचा उमेदवार नसल्याने त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यावा लागला. तसेच विरोधी उमेदवाराने जनतेसाठी काय काम केले आहे असा प्रश्न श्रीरंग बारणे यांनी एका वहिनीला मुलाखत देताना उपस्थित केला होता. याचा समाचार घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी म्हणाले, 2014 व 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागणाऱ्या बारणे यांना विकास कामांचा विसर पडला आहे. ज्यांच्या जीवावर निवडून आले त्या भाजपाला देखील त्यांनी कधी विचारले नाही. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना ते पुन्हा त्यांच्यात नावावर मते मागत आहेत. निवडून आल्यानंतर मतदार संघातून गायब होणारे खासदार पुन्हा निवडणुकीला दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्यांच्या विरोधात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या कार्य अहवालात दहा वर्षात काय ठोस कामे केली हे न सांगता प्रस्तावित कामे दाखवली आहे. अशा या निष्क्रिय व्यक्तीला आता घरी बसवण्याची वेळ आली असल्याने सर्वसामान्य मतदार एकवटला आहे. मागील दोन निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदान करणारा तरुण आज मात्र दहा वर्षात खासदारांनी आमच्यासाठी काय केले हा प्रश्न उपस्थित करत आहे. शेतकरी, महिला ह्या देखील दहा वर्षात आमच्यासाठी काय केले हा स्थानिक प्रश्न उपस्थित करत आहे. सर्वच मतदार संघात काय काम केले ते दाखवा व मगच मत मागा असे खुले आवाहन नागरिक करत त्यांना नाकारत असल्याने नैराश्यातून ते प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करत असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले. वाघेरे म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे. त्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे न सुटल्याने ते संतप्त झाले आहेत. मतदार संघाचा रखडलेला विकास हाच माझा अजेंडा असणार आहे.
काल पर्यंत त्यांच्या विरोधात आग पाखड करणारे आज स्वतःच्या भवितव्यासाठी त्यांना मत द्या असे आवाहन नागरिकांना करत आहे. मात्र नागरिक देखील स्पष्ट शब्दात तुमच्या वेळेस काय ते बघू आता आम्हाला काय करायचे ते करू द्या असे थेट नेत्यांला सुनावत असल्याने त्यांची देखील अडचण झाली आहे. सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या समस्या सोडविणारा, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार लोकप्रतिनिधी हवा आहे. केवळ संसदेत मोठ मोठी भाषण करत स्वतःच्या नावावर रेकॉर्ड बनविणारा नको आहे.
तळेगाव दाभाडे, वडगाव, कान्हे, नायगाव भागात महा विकास आघाडीच्या वतीने प्रचार राबवत वाघेरे यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाची अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शांताराम भोते, अमित कुंभार, युवराज सुतार, सुरेश गायकवाड, मदन शेडगे, सोमनाथ कोंडे आदी उपस्थित होते.