Breaking news

कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम 31 मे पूर्वी पूर्ण करा - एकवीरा कृती समितीची मागणी

लोणावळा : कार्ला मळवली दरम्यान असणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम 31 मे पूर्वी पूर्ण करा अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ यांच्याकडे काल निवेनाद्वारे करण्यात आली होती तसेच आज पत्रकार परिषद घेऊन देखील सदरची मागणी करण्यात आली आहे.

      कार्ला मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. 100 मीटर लांब व 10 मीटर रुंद एवढे हे मोठे काम असून ऑक्टोबर महिन्यापासून या कामाला सुरुवात झाली आहे. एक जून नंतर पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील दोन महिन्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. अन्यथा कार्ला मळवली परिसरातील जवळपास 25 गावांचा संपर्क तुटणार आहे. मळवली भागामध्ये जगप्रसिद्ध भाजे लेणी, लोहगड व विसापूर हे किल्ले असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात. पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना व कार्ला मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच 25 गावांचा संपर्क तुटणार असल्याने या भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक या सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नदीपात्रात पुलाचे काम सुरू आहे. त्याकरिता शेजारून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मातीचा भराव करून रस्ता बनवण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात काम करताना जे मातीचे उत्खनन करण्यात आले आहे ती माती देखील पात्रात पडून आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा हा राडाराडा बाजूला न केल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते पाणी आजूबाजूच्या भात शेतीमध्ये पसरून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. साधारणपणे 7000 एकर क्षेत्र या भागात असल्याने सदरचे नुकसान टाळण्यासाठी व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व पर्यटन व्यवसायावर येणारी गदा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवस रात्र एक करत सदरचे काम 31 मे पूर्वी पूर्ण करावे अशी मागणी एक वेळा कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.

       एकविरा कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे, किरण हुलावळे, विजय तिकोणे, संतोष केदारी, उस्मान इनामदार, संजय देवकर, बाळासाहेब आंबेकर, रघूनाथ मराठे, चेतन थोरवे, संजय उबाळे, सचिन रगडे, शांताराम तिकोणे, बाळु तिकोणे, सतिश रगडे, एकवीरा कृती समिती सदस्य व कार्ला मळवली परिसरातील ग्रामस्थ या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

       कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते ज्ञानेश्वर राठोड म्हणाले, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदरचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. आर्च पद्धतीचे पिलर उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याकरिता लागणारे स्टील मटेरियल उपलब्ध असून दिवस रात्र काम करण्याबाबत सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत. आम्ही स्वतः देखील या कामांमध्ये जातीने लक्ष घालत आहे. नदीपात्रातील दगड कठीण असल्याने तो फोडून पायाभरणीचे पिल्लर तयार करण्यास सुरुवातीला वेळ गेला. सर्व 10 मोऱ्याचे कॉलम फाऊंडेशन झाले आहे. त्यामुळे पुढील काम गतीने होणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेऊन, पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहतुकीसाठी पूल खुला करू तसेच नदीपात्रातील राडाराडा देखील काढून घेतला जाईल, नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे.







इतर बातम्या