Bhushi Dam l लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेल्या भुशी धरण परिसरामध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी व वर्षा विहारासाठी आलेल्या तरुणांपैकी दोन तरुण पर्यटकांचा धरणाच्या जलाशयामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी 8 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. दोघे तरुण हे उत्तर प्रदेश येथील असून सध्या ते पिंपरी चिंचवड भागामध्ये होते.
लोणावळा शहरामध्ये अद्याप मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळे अद्यापही भुशी धरण हे भरलेले नाही. असे असले तरी भुशी धरणावर व धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. आज देखील सकाळपासून भुशी धरण व धरणाच्या पायऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यातच काही तरुण व अति हौशी पर्यटक हे धरणाच्या मागील बाजूला डोंगर भागाकडे गेले होते. डोंगर भागाकडून धरणाच्या जलाशयामध्ये जलक्रीडा करण्यासाठी उतरलेल्या तरुणांपैकी दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे.
मो. जमाल (वय 22 वर्ष, राहणार रमजान अली, विजापूर, उत्तरप्रदेश) व साहिल असरफ अली शेख ( वय 19 वर्ष, राहणार पीसीएमसी यशवंतराव चव्हाण हिंदी शाळा, थेरगाव, पुणे) अशी धरणाच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये दोन तरुण बुडाले असल्याची माहिती दुपारच्या सुमारास समजतात लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलीस कर्मचारी यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. सर्व सुरक्षा साहित्यांसह घटनास्थळी दाखल झालेल्या शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने पाणबुडी च्या सहाय्याने ज्या ठिकाणी तरुण बुडाले होते त्या ठिकाणी शोध घेत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह चार ते सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान पाण्यातून बाहेर काढले.
शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील महेश मसणे, सचिन गायकवाड सर, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांनी ही रेस्क्यू पूर्ण केले.
पर्यटकांचा अति उत्साह ठरतोय जीवघेणा !
लोणावळा शहर व मावळ तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामध्ये पर्यटनासाठी येत असतात. मात्र काही तरुण व हौशी पर्यटकांचा अति उत्साह हा जीवघेणा ठरत असून त्यामुळे पर्यटन स्थळांच्या नावलौकिकाला देखील गालबोट लागत आहे. भुशी धरण अद्याप भरलेले नाही पावसाचे प्रमाण देखील अद्याप कमी आहे असे असताना लोणावळा परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या तरुणांचा एक समूह हा धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पोलिसांची व स्थानिक व्यवसायिकाची नजर चुकवून धरणामध्ये उतरतो व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी दोन जणांना आपला जीव गमवावा लागतो. मागील वर्षे देखील याच धरणाच्या दुसऱ्या बाजूकडील एका धबधब्यामध्ये अशाच प्रकारे जीवघेणा प्रकार करताना काही पर्यटक वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या धरण व परिसरातील व्यवसायिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. वास्तविक पाहता पर्यटकांच्या अति उत्साहामुळे या दुर्घटना घडत असतात मात्र त्याचा दूरगामी परिणाम हा त्या पर्यटन स्थळांवर त्या भागाच्या नावलौकिकावर व स्थानिकांच्या व्यवसायावर होत असतो. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही पर्यटन स्थळांवर गेल्यानंतर सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचना स्थानिक व्यावसायिकांनी दिलेला सूचना याचे पालन करणे गरजेचे आहे. आत्ताच कुठे पर्यटन हंगाम सुरू झाला आहे भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावे असेच अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.