लोणावळा शहरातील मागील तीन वर्षापासून रखडलेल्या नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला अखेर सुरुवात

लोणावळा : लोणावळा शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या मात्र भूसंपादनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मागील तीन वर्षापासून रखडलेल्या नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल अशा कामाला अखेर आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मागील तीन ते चार महिन्यापासून या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व लोणावळा नगर परिषदेमध्ये सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार सुनील शेळके यांच्या विनंतीवरून या कामाची पाहणी करण्यासाठी पाच जून रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पुलाचे काम ज्या ठिकाणी रखडले आहे त्या ठिकाणाची पाहणी करत सोमवार पासून कोणत्याही परिस्थितीमध्ये कामाला सुरुवात करा असे आदेश लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला दिले होते. त्या आदेशाप्रमाणे आज सोमवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून नांगरगाव बाजूला ज्या ठिकाणी उड्डाणपूलाचे खांब उभे करायचे आहेत त्या ठिकाणी असलेले सुरक्षा कंपाऊंड काढण्यात आले असून काम सुरू झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पर्यायी रस्ता देखील तयार करण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व भाजपा गटनेते देविदास कडू, लोणावळा शहर भाजपा माजी अध्यक्ष अरुण लाड, वैभव देशपांडे, सचिन साठे आदींनी यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम सुरू करताना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता महत्त्वाची भूमिका पार पाडली. याविषयी बोलताना देविदास कडू म्हणाले, नागरिकांची होणारी गैरसोय ध्यानात घेता, आमदार सुनील शेळके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही काम सुरू केले आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करत नागरिकांनी हा उड्डाणपूल खुला करून देण्यासाठी आम्ही सर्वजण आमदार सुनील शेळके यांच्यासोबत या कामाकडे जातीने लक्ष देणार आहोत.
लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील नांगरगाव भांगरवाडी रेल्वे गेट क्रमांक 32 येथे उड्डाणपूल बांधण्याचा ठराव लोणावळा नगरपरिषदेने 5 डिसेंबर 2013 रोजी मंजूर केला होता. 2015 साली रेल्वे प्राधिकरण व लोणावळा नगरपरिषद यांच्यामध्ये या कामा संदर्भात करारनामा करण्यात आला. सात सप्टेंबर 2019 रोजी या कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. पावसाळा वगळता साधारण 18 महिने या कामाची मदत होते. कामाला सुरुवात झाल्यानंतर जगभरात आलेल्या कोरोना महामारीमुळे पंधरा महिने हे कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर सुमारे तीन वर्ष तांत्रिक अडचणींमुळे सदरचे काम बंद पडले होते. कामाचा कार्यादेश देत असताना ज्या ठिकाणी उड्डाणपूलाचे खांब उभे करायचे होते ती जागा नगरपरिषदेने भूसंपादित केलेली नव्हती. जागा ताब्यात नसताना देखील उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. जी जागा उपलब्ध होती. त्या ठिकाणी ठेकेदाराने उड्डाणपूलाचे खांब उभे केले मात्र पुढे येऊन काम रखडले गेले. जोपर्यंत जागा ताब्यात मिळत नाही तोपर्यंत पुढील खांब उभे करायचे कसे असा प्रश्न ठेकेदारासमोर देखील उभा राहिला होता. त्यामुळे काम बंद पडले होते. प्रशासनाने मागील चार पाच महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यखेर नांगरगाव बाजूकडील जागेचा प्रश्न सुटला आहे. व त्याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. भांगरवाडी भागातील जागेचा विषय देखील येत्या काही दिवसात मार्गी लावत ती जागा देखील कामासाठी उपलब्ध करून दिली जाईल असा शब्द जिल्हाधिकारी व आमदार सुनील शेळके यांनी ठेकेदाराला दिला आहे. त्यामुळे आता ही उड्डाणपुलाचे काम लवकर मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सध्याचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे व त्यांच्या प्रशासकीय टीमने या तांत्रिक बाबी सोडवत भूसंपादनाचा विषय मार्गी लावला आहे. माननीय उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने व त्यामधील स्थानिक सदस्य यांनी देखील या करिता मोलाची भूमिका बजावली आहे.