चर्चा तर होणारच ! वर्षभर झोपलेल्या प्रशासनाला उपोषणानंतर आली जाग; पाऊस सुरू असताना केली कामाला सुरुवात

लोणावळा : कार्ला ते मळवली दरम्यान मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुलावळे यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर मागील वर्षभरापासून झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला खडबडून जाग आली असून पाऊस सुरू असताना देखील त्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे.
कार्ला मळवली रस्त्यावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार नसल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत होते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर हुलावळे यांनी सोमवारी (ता. 26) सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीविरोधात आमरण उपोषण सुरु केले होते.
मंगळवारी (ता. 27) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. ए. दराडे यांनी भेट देऊन रस्ता लवकरच दुरुस्त करण्यात येईल व कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आश्वासन दिले. यावेळी बांधकाम अभियंता ज्ञानेश्वर राठोड, मंडल अधिकारी आशा धायगुडे, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, तलाठी दीपक धनवडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, पोलीस पाटील संजय जाधव उपस्थित होते.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनीही घटनास्थळी भेट दिली. ग्रामपंचायतीमार्फत सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी तात्पुरते गटार खोदले गेले असून, पावसाळी गटारे तयार करून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्यावर भाऊसाहेब हुलावळे यांनी आपले उपोषण स्थगित केले.