मावळातील मोठी दुर्घटना l इंदुरी (कुंडमळा) येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू, 51 जण जखमी

मावळ माझा न्युज नेटवर्क (15 जून 2025) :
मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदीवरील 30 वर्ष जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याची गंभीर घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. या दुर्घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत. पूल कोसळण्याच्या वेळी जवळपास 100 ते 125 पर्यटक परिसरात वर्षाविहारासाठी आले होते.
हा पूल स्थानिक दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. पूल कोसळून अनेकजण अडकल्याची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) दोन पथक, CRPF, पिंपरी चिंचवड पोलिस, आपदा मित्र, PMRDA अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, आणि वन्यजीव संघटनांनी संयुक्तपणे मदत व शोधकार्य सुरू केले. जखमींना पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल (सोमाटणे फाटा) येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या कोसळलेला पूल क्रेनच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त (पुणे), खासदार (बारामती), आमदार (मावळ), जिल्हाधिकारी (पुणे), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिक माहितीसाठी खालील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा:
???? टोल फ्री: 1077
???? नियंत्रण कक्ष: 020-26123371 / 26133522 / 26133523
???? श्री. विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 8975232955
???? श्री. राहुल पोखरकर (सहाय्यक): 8888565317
घटना दुर्दैवी; पर्यटकांनी सुरक्षेबाबतच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे – आमदार सुनील शेळके
आज मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली घटना अतिशय दुदैवी व मन हेलावून टाकणारी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक म्हणून फलक लावण्यात आलेले आहेत. व पर्यटकांनी या पुलावर जाऊ नये, दुचाकी घेऊन जाऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील पर्यटक सूचनांकडे कानाडोळा करत मोठ्या प्रमाणात या पुलावर उभे होते. दुचाकी जात होत्या. क्षमतेपेक्षा जास्त लोड झाल्याने ही दुर्दैवी व दुःखद घटना घडली आहे. मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी देखील या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे असे आमदार सुनील शेळके म्हणाले. पर्यटन स्थळांवर घडणाऱ्या या दुर्घटनामुळे त्या पर्यटनस्थळांचा नावलौकिकाला देखील गालबोट लागत असून त्याचा दूरगामी परिणाम सर्वांना भोगावा लागतो आहे.