Breaking news

खासदार संभाजी राजे - शिवसेनेची ऑफर नाकारली; राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढण्याचा निर्णय; राष्ट्रवादीचा पाठिंबा तर शिवसेना दुसरा उमेदवार देणार

पुणे : राज्यात भाजप शिवसेना संघर्ष सुरू आहे. त्यातच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय पुणे येथील पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने खासदार संभाजी राजे यांना पाठींबा देणारे पत्र दिले. त्यातच शिवसेना राज्यसभेची सहावी जागा लढणार असल्याचे अनिल परब यांनी जाहीर केले. त्यामुळे संभाजी राजे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. खासदार संभाजी राजे यांनी पुणे येथील सभेत पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. त्यानंतर संभाजी राजे यांनी यापुढे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध असणार नाही. तसेच राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर संभाजी राजे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मित्र पक्षांना विश्वासात न घेता पाठिंबा दिल्याचे सांगत काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली आहे. तर शिवसेनेने सहावी जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने खासदार संभाजी राजे यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत मी अपक्षच निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

मतांचे गणित - 31 मे रोजी राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. तर दहा जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आमदारांच्या एकूण संख्याबळानुसार भाजप 2, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष प्रत्येकी 1 जागा मिळवू शकते. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता चुरस वाढली आहे. या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र या जागेवर शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्यासमोरीत पेच वाढला आहे.

    राज्यात भापजकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. त्यामध्ये शिवसेना 55, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहे. तर इतर पक्ष आणि 8 अपक्षांचे महाविकास आघडीला समर्थन आहे. राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांच्या कोट्याचे सुत्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार राज्याची एकूण विधानसभा सदस्यसंख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा+ 1 यानुसार कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार हे ठरत असते. राज्यात 288 आमदार / राज्यसभेच्या 6 रिक्त जागा+ 1 म्हणजेच 288÷6 = 41.14 +1= 42.14 म्हणजे एका जागेसाठी 42 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप आपल्या संख्याबळामध्ये दोन खासदार निवडून आणू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 खासदार निवडून आणू शकतात. सहाव्या जागेसाठी 42 मतांची आवश्यकता आहे. मात्र भाजपकडे 22 तर शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून 33 मतं अतिरिक्त आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी पेच वाढला आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शिवसेना सहाव्या जागेसाठी ताकद लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजी राजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सहावी जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

इतर बातम्या