रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रभावीपणे राबवा - पोरवाल
लोणावळा : पारंपारिक व्यवसायाला गती व चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची रायगड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणाने अंमलबजावणी करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी उपजिल्हाधिकारी संजय थोरवे यांना आज दिले आहे.
पोरवाल म्हणाले, रायगड जिल्ह्यातील सुधागड येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत किती जणांना लाभ देण्यात आला याची माहिती विचारली असता एकही लाभार्थी नसल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील बेरोजगारी कमी करण्याच्या हेतूने पारंपारिक व्यवसाय करणारे बारा बलुतेदार यांच्याकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही सुरू केली असून त्याकरिता मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली आहे. मात्र ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मिळत नाही. याकरिता आज उपजिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना द्याव्यात तसेच ग्रामपंचायत स्तरावर याबाबतची माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली असल्याचे सांगितले.