Talegaon News : धुलीवंदनाच्या आनंदावर विरजण; हातपाय धुताना पाय घसरल्याने एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

लोणावळा : धुलीवंदनाचा आनंद लुटल्यानंतर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन युवकाचा इंद्रायणी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव जवळील वराळे गावच्या हद्दीत घडली आहे.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय- 21, रा. तारखेड, पाचोरा जळगाव) असे इंद्रायणी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली. जयदीप हा तळेगाव जवळील आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 7 ते 8 विद्यार्थी धुलीवंदनाचा आनंद लुटल्यानंतर ते सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. यावेळी हातपाय धुताना जयदीप पाटील याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्याला वाचविण्यात अपयश आल्याने अखेर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी जयदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना जयदीपचा मृतदेह शोधण्यास यश आले व मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.