Breaking news

AJIT PAWAR : आयकर विभागाच्या छापेमारी मागील खरे सुत्रधार देवेंद्र फडणवीस - आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवसरात्र काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप नेते जाणीपूर्वक बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजितदादांकडे पाहत असल्याने भाजप नेत्यांचा पोटशूळ उठत आहे. दादांच्या नातलगांवरील केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.

   आमदार शेळके म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती खंबीरपणे हाताळली. कोरोना कालावधीत दररोज सकाळी सहा वाजता मंत्रालयात जाऊन राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवणे, अडचणीतील नागरीकांना मदत केली. या कठीण काळात राज्याची आर्थिक घडी सावरली. त्यातून आरोग्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मंत्रालयात सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे अजितदादा प्रश्न सोडवितात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कामाच्या जोरावर अजितदादांनी राज्यातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इतर राजकारण्यांसारखे अजितदादा नागरिकांना ताटकळत ठेवत नाहीत. काम होणार असेल तर ते झटकण करतात आणि होणार नसेल तर तोंडावर होणार नाही असे सांगतात. राज्यातील तरुणांमध्ये दादांची मोठी क्रेझ असून दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होत आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजितदादांकडे पाहत आहे. त्यामुळे भाजपचा पोटशूळ उठला आहे. त्यातूनच केंद्रीय संस्थाचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास दिला जात आहे.

   कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ, कोकणातील वादळ या महाराष्ट्रावर आलेल्या संकटात देखील सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. असे असताना भाजपा नेते अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून यामागील खरे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासारखे नेते महाविकास आघाडी सरकारवर खोटेनाटे आरोप करून बदनामी करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहेत. पण, महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या भूलथापांना कदापी बळी पडणार नाही.

   ज्यांची सत्ता गेली. त्या भाजप नेत्यांना वाटते, आता पुन्हा आपली सत्ता येणार नाही म्हणून ही षडयंत्रे रचण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला. भाजपच्या या दबावतंत्राला, सूडाच्या राजकारणाला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते घाबरणार नाहीत. भाजपला पुरून उरतील असा विश्वासही आमदार शेळके यांनी व्यक्त केला. तसेच जनतेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेऊन पुरोगामी महाराष्ट्रात सुडाचे राजकारण चालणार नाही, याचा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी केले. अजितदादा यांच्या समर्थनासाठी आज पुणे जिल्हा व मावळ तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये मावळचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव भेगडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

इतर बातम्या