Breaking news

चर्चा तर होणारच ! ग्रामीण भागातील प्रवाशांच्या जीवाशी खेळ – एसटी महामंडळाचे दुर्लक्ष?

मावळ माझा न्युज नेटवर्क : एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून ग्रामीण भागातील प्रवाशांकडे होणारे दुर्लक्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तळेगाव ते सावळा या सुमारे 50 किमी लांब अंतरासाठी महामंडळ जुन्या, नादुरुस्त व अपुऱ्या देखभाल केलेल्या एसटी गाड्या पाठवत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ होतो आहे.

       हा मार्ग अत्यंत अरुंद, वळणदार, आणि दर्‍या खोऱ्यांनी भरलेला असताना देखील चालविण्यात येणाऱ्या बस गाड्या बऱ्याचशा धोकादायक स्थितीत आहेत. अनेक बस गाड्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या स्थितीत आहेत, काही गाड्यांमध्ये आपत्कालीन दरवाजेही बंदिस्त असून दरवाजे दोऱ्यांनी बांधून ठेवले जात आहेत. शिवाय वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने बस वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. या मार्गावर शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांचा प्रवास असतो. त्यामुळे जर अपघात घडला, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे.

      त्यात भर म्हणून, तिकीट दरात प्रचंड वाढ करूनही सुविधा तशाच ढिसाळ. उदा. तळेगाव ते सावळा एकेरी तिकीट दर 101 रुपये तर सावळा ते कान्हे फाटा 81 रुपये इतका असूनही प्रवाशांना चांगल्या व सुस्थितीमध्ये असलेल्या बस मिळत नाही. स्थानिक प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे मागणी केली आहे की, ग्रामीण मार्गांवर देखील चांगल्या स्थितीतील, सुरक्षित व वेळेवर सेवा देणाऱ्या एसटी बस चालवाव्यात. अन्यथा, जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहील.

इतर बातम्या