शेकापचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना आषाढी एकादशीच्या वारी सारखा असतो - आमदार बाळाराम पाटील
खोपोली (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे कार्यकर्त्यांची उर्जा वाढविणारा आणि त्यांच्यासाठी आषाढीच्या वारी सारखा असतो. या निमीत्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन आमदार बाळाराम पाटील खोपोलीत आयोजित बैठकीत केले. शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा वडखळ येथे होणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी खोपोलीतील लोहना समाज हॉल येथे खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जिल्हा चिटणीस आस्वाद (पप्पू) पाटील, आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, माजी उपाध्यक्ष प्रदीप नाईक, देवा पाटील, जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, जिल्हा नेते संतोष जंगम, खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, किशोर पाटील, खोपोली माजी नगरसेवक, खालापूर नगरपंचायतीचे प्रतिनिधी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील राजकारण विचित्र वळणावर असून पक्षाने मोठी जबाबदारी देवूनही नेते नेत्यांशी व पक्षाशी प्रामाणिक नाहीत पण शेकापचा कार्यकर्त्या आता पर्यत कुठेही गेला नाही याचा अभिमान आहे. 2 ऑगस्ट रोजी शेकापचा 75 वा वर्धापन दिन असल्याने त्याची जय्यत तयारी सुरू केली असल्याचे किशोर पाटील यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. मेळाव्यासाठी एक हजाराहून अधिक कार्यकर्ते खालापूर व खोपोली शहरातून उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले. माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांनी सांगितले की, सत्ता नसतानाही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे धारिष्ट्य कार्यकर्त्यांमध्ये आहे याचा अभिमान वाटतो आपण नव्या उमेदीने येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन करताना सद्याच्या राजकीय अस्तिरतेचा फायदा भाजप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे केव्हाही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्यासाठी 2 ऑगस्टला मोठया संख्येने उपस्थित राहून आगामी निवडणुकीसाठी ऊर्जा घेऊन तयारीला लागा असा सल्ला कार्यकर्त्याना दिला. खालापुरातील शेकापचे कार्यकर्ते एकसंघ आहेत त्यामुळे ते कधीही बाजी मारू शकतात त्यांनी संघटना अतिशय चांगल्या पध्द्तीने टिकवून ठेवल्याने दिसून येत आहे त्यामुळे कार्यकर्त्याची प्रामाणिकता आम्हालाही प्रेरक ठरत असल्याची कबुली देताना कर्जत खालापूरात पुन्हा शेका पक्षाची सत्ता येईल असेही प्रतिपादन आमदार बाळाराम पाटील यांनी केले.