सहा महिन्यांपासून जी वाॅर्ड मधील नागरिकांना मिळतंय दुषीत पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - राजु बोराटी
लोणावळा : मागील सहा महिन्यांपासून जी वाॅर्ड, लोणावळा येथील नागरिकांना दुषीत पाणी येत आहे. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जी वाॅर्ड येथील रहिवासी असलेले राजु बोराटी यांनी संताप व्यक्त केला आहे.
बोराटी म्हणाले मागील सहा महिन्यांपासून जी वाॅर्डची गटारीमधील पाण्याची लाईन लिकेज झाली आहे. त्यामधून गटारीचे पाणी नागरिकांना येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील पाणीपुरवठा विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल आहे. सदरचे दुषीत पाणी पिल्याने नागरिकांना काही आजार झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार. सध्या कोरोना पाठोपाठ सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, काविळ य साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालत तात्काळ सदरचे लिकेज बंद करत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी बोराटी यांनी केली आहे.